7
" शरीर हे एकच साम्राज्य असं आहे, आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात, एकमेकींचं एकमेंकींवर अतिक्रमणही होतं. त्या वेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात. अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे पाच सल्लागार. दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकूमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानींत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही. "
― V.P. Kale , वपुर्झा
15
" एकदा एका लाकूडतोड्याची बायको विहिरीत पडली. त्याला पोहता येत नव्हतं, पण त्याच वेळेला त्याला एक अशीच जुनी घटना आठवली. त्यानं विहिरीच्या काठावर बसून परमेश्वराचा धावा सुरू केला. हा धावा अंत:करणापासून आहे, हे त्या दयाघनाने जाणलं. ज्ञानेश्वरीच्या भांडवलावर प्रवचनांचा धंदा करणाऱ्या पंडित-पुरोहितांची ती हाक नव्हती. तो धावून आला. त्याने विहिरीत उडी मारली. परकीयांच्या भांडवलावर चालणाऱ्या चित्रपटसृष्टीतल्या माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या एका देखण्या बाईला घेऊन तो काठावर आला. अस्सल मोत्यांच्या दागिन्यांनी ती लगडलेली होती. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणाला, ‘‘भगवंता, ही माझी पत्नी नाही.’’ परमेश्वराने पुन्हा बुडी मारली आणि तो काठावर आला. ह्या वेळेला तर डिम्पलला मागे सारील अशी युवती. सुवर्णालंकारांच्या भाराने वाकलेली. पुन्हा हात जोडीत लाकूडतोड्या म्हणाला, ‘‘का भक्ताची मस्करी करता?’’ परमेश्वराने तिसऱ्यांदा सूर मारला. ह्या वेळेला काजोलसारखी यौवना आणि अंगावर नजर दिपून जाईल असे हिऱ्याचे अलंकार. लाकूडतोड्या पुन्हा काकुळतीला आला. मग भगवंताला त्याच्या निर्लोभी मनाची करुणा आली आणि लाकूडतोड्याच्या खऱ्याखुऱ्या अर्धांगीसह तो वर आला. पहिल्या तिघी विहिरीच्या काठावरच बसल्या होत्या. लाकूडतोड्याने स्वत:च्या पत्नीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, ‘‘भगवंता, तुम्हाला खूप कष्ट दिले; पण हीसुद्धा माझी पत्नी नाही.’’ जगदीश्वराला धक्काच बसला. ‘‘असं कसं म्हणतोस? मीच तुमची जन्मगाठ घालून दिली होती.’’ ‘‘होय दयाघना. तरी मी हिचा स्वीकार करीत नाही, कारण...’’ ‘‘बोल!’’ ‘‘मागे एकदा आपण अशीच एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड विहिरीतून काढून दिली होतीत. ते माझे पणजोबा. त्यांना तुम्ही सद्वर्तनाबद्दल तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्यात. तसं पुन्हा केलंत तर? एका पत्नीचं पोट भरताना नाकात दम आलाय. आता जंगलतोड थांबवायची, असं वर्षानुवर्षं म्हणताहेत. पण हॉटेल्स बांधणारे बिल्डर्स सुटतात. वनरक्षक वनभक्षक झालेत. मी नेमका सापडलो तर चार बायकांना कसं सांभाळू?’’ ‘‘अरे वेड्या भाबड्या, त्या तिघींच्या अंगावरचे दागिने पाहिलेस तर तुला दोन पिढ्यांचा प्रश्न सोडवता येईल.’’ लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘‘माझ्या पणजोबांच्या काळात इन्कमटॅक्सवाले नसावेत. कायद्याचं राज्य होतं. तुम्हीही गुप्त व्हा. तुमच्याजवळ रत्नजडित मुकुटापासून सगळं आहे. "
― V.P. Kale , Panpoyee (Marathi)
16
" लग्न-विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कर्हाडे, सी.के.पी., एस.के.पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती आपल्यासारखीच जिवंत आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौंदर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, हे मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टींभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं? "
― V.P. Kale , Aapan Sare Arjun