Home > Work > वपुर्झा
1 " As you write more and more personal becomes more and more universal. "
― V.P. Kale , वपुर्झा
2 " शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती . वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. "
3 " शरीर हे एकच साम्राज्य असं आहे, आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात, एकमेकींचं एकमेंकींवर अतिक्रमणही होतं. त्या वेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात. अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे पाच सल्लागार. दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकूमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानींत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही. "
4 " स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. "
5 " व्यवहारी माणसांत, समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती? "